मौजे चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे…

0


जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे
– क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. २२ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा गौरव करण्यासाठी मौजे चौंडी येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे झाला. धनगर समाजाच्या महान परंपरेतील त्या एक तेजस्वी व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून त्यांचा गौरवशाली जीवनपट व धनगर समाजाची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि जीवनशैली आगामी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता वाशिम जिल्ह्यातील बंजारा विरासत स्मारकाच्या धर्तीवर मौजे चोंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे. या स्मारकासाठी ५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला द्याव्यात असेही मंत्री श्री.भरणे यांनी निवेदनात नमुद केले आहे.

धनगर समाज हा हजारो वर्षापासून या देशात अस्तित्वात असलेला श्रमशील व संस्कृतीने समृद्ध असलेला वर्ग आहे. शेती पशुपालन आणि लोकजीवनातील योगदानाबरोबरच अनेक समाजसुधारक, योद्धे, संत, गायक, कलाकार या समाजातून उदयास आले आहेत. धनगर संस्कृतीचे वैभव पोशाख, वेशभूषा, बोलीभाषा, लोककला, संगीत, धार्मिक परंपरा आणि जीवनपद्धती यामध्ये प्रतिबिंबित होते. हे स्मारक केवळ एक सांस्कृतिक स्मारक न राहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास, धनगर समाजाच्या परंपरा, जीवनशैली, लोककला, साहित्य, संगीत आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दस्तावेज जतन करणारे वैभवशाली इतिहासाचे प्रतीक ठरले, असा विश्वासही त्यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *