गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळवले, आता सुराज्याकडे वाटचाल करूया – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

            मुंबई, दि. १८ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच राज्य शासनाने घेतली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले.

            समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली, यामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्ती, राष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.

            आज राज्यभरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आज उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्यातून समाजातील समस्या मांडण्याबरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अविरत करत असतात. यावर्षी सुद्धा नदी संवर्धन, शिक्षण, पर्यावरण यासारखे विषय मांडून समाजाला दिशा दिली असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार यावेळी देण्यात आले.

याशिवाय जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव

1 अमरावती : एकविरा गणेशोत्सव मंडळ 2 औरंगाबाद : कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ 3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ 4 भंडारा : आदर्श गणेश मंडळ 5 बुलढाणा : सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली 6 चंद्रपूर : न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड 7 धुळे : श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर 8 गडचिरोली : लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी 9 गोंदिया : नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी 10 हिंगोली : श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी 11 जळगांव : जागृती मित्र मंडळ, भडगांव 12 जालना : संत सावता गणेश मंडळ, परतूर 13 कोल्हापूर : श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी 14 लातूर : बाप्पा गणेश मंडळ 15 मुंबई शहर : पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग 16 नागपूर : विजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा 17 नांदेड : अपरंपार गणेश मंडळ 18 नंदुरबार : क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ 19 नाशिक : अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर

20 उस्मानाबाद : बाल हनुमान गणेश मंडळ 21 पालघर : साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा 22 परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा 23 पुणे : जयजवान मित्र मंडळ, नानापेठ 24 रायगड : संत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड 25 रत्नागिरी : पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड 26 सांगली : तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा 27 सातारा : सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळ, सावली 28 सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा 29 सोलापूर : श्रीमंत मनाचा कसबा गणपती 30 ठाणे : धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी 31 वर्धा : बाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर 32 वाशिम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ 33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

            गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्ह्यातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

            यावेळी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, आदी उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *