ठाणे, दि. 11 (जिमाका) : बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी सामाजिक जाणिव ठेवून लोकांच्या जीवनात बदल घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
भाईंदर मधील राई गावात बालयोगी सदानंद महाराज आयोजित रामभक्त गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल राम नाईक, बालयोगी श्री सदानंद महाराज, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, नरेंद्र मेहता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सदानंद महाराज हे राज्याचे वैभव आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर करून जगभर पोचविण्याचे काम केले. ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा देशभर आयोजित करण्याचा संकल्प सदानंद महाराज यांनी केला आहे. बालयोगी सदानंद महाराजांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच भावना व अनुभूती निर्माण होते. सदानंद महाराज हे सामाजिक सुधारणेचे अग्रदूत आहेत. परिवर्तन घडविण्याचे काम ते करत आहेत. बाबांमुळे व्यसनमुक्तीचे काम होत आहे. बाबांच्या दर्शनाने लोकांसाठी, चांगले काम करण्याचे बळ मिळते. महाराष्ट्राला वारकरी परंपरेचा मोठा वारसा मिळाला आहे. विश्वशांतीमुळे मानवकल्याणाचा संदेश मिळतो आहे.