
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री , काँग्रेसचे नेते व स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. विश्व हिंदू परिषदेने मा. मुख्यमंत्र्याना हे नामांतरण रोखण्याची विनंती केली परंतु “वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल” याच नावाने उद्धाटन करण्यासाठी आमदार अस्लम शेख आपल्या हट्टावर कायम आहेत.
कुठल्याही देशाची संस्कृती ही त्या देशाची ओळख असते. मग असे असताना देश लुटायला आलेल्या लुटारूचे “वीर” संबोधून उदात्तीकरण कसे सहन करायचे ? टिपू सुलतान अत्यंत क्रूर हिंदू विरोधी शासक होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंची क्रूरपणे हत्या केली त्याना तलवारीच्या जोरावर जबरदस्ती धर्मांतरण करण्यास भाग पाडले. अनेक हिंदू महिलांवर अनन्वित अत्याचार केले अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. भारत देश हा साधू संताचा देश आहे हा वीर महापुरुषांचा देश आहे. त्या पैकी कोणाचे ही नाव देता येईल.
आज देश कोविड महामारीचे संकट उभे असताना हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटचा सहकारी मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांचे हे वर्तन अत्यंत बेजवाबदार पणाचे आहे. देशातील महापुरुषांचा अपमान करून देशाच्या अस्मितेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर ते विश्व हिंदू परिषद, बजरंगदल कदापी सहन करणार नाही. ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ नामकरणास त्वरित थांबवावे व मुंबईच्या पालक मंत्र्यांनी आपल्या बेजवाबदार वर्तना बद्दल देशातील हिंदूंची माफी मागावी विश्व हिन्दू परिषदेची मागणी आहे.