स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई उपनगर मधील 15 वॉर्ड निहाय स्वच्छतेचे विविध उपक्रम

            मुंबई, दि. 2 : ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात  श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

     ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान ‘या विषयी  मुंबई महानगर प्रदेश विकास कार्यालय येथे  पूर्व तयारी बाबत आयोजित  बैठकीत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी मुंबई उपनगर च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुंबई महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकारी चंदा जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, असोसिएशनसचे पदाधिकारी  उपस्थित होते.

      पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, हे अभियान मुंबई महापालिकामार्फत राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्ड मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना,  स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा ,महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे,सागरी किनारे यांची स्वच्छता करावयाची आहे.प्रत्येकाने दि. 1 ते 31 डिसेंबर 2022 या अभियान कालावधीत प्रत्येक शनिवार, रविवारी  जेवढा वेळ श्रमदान करता येईल त्या सर्वांनी संबंधित वॉर्ड निहाय स्वच्छतेचे उपक्रम राबवता येतील. प्रत्येक संस्थांनी ज्या प्रकारे  या उपक्रमात सहभाग घेणे शक्य आहे  याची माहिती वॉर्ड ऑफिसर यांना द्यावी. शाळा महाविद्यालयामध्ये जनजागृती पर कार्यक्रम देखील घेता येतील.  विविध सामाजिक संघटना  त्यांना शक्य असेल त्या सोयीच्या ठिकाणी श्रमदान करू शकतील. सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म,  उद्याने, मंडया, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय/निमशासकीय कार्यालये, बीचेस, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर इत्यादी ठिकाणांची मिशन मोड मध्ये काम करता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या, मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत  येणाऱ्या शाळा महाविद्यालय, सर्व गृहनिर्माण सोसायट्या,सर्व रुग्णालये, सार्वजनिक ठिकाण, प्रत्येक शासकीय विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनजागृती पर उपक्रम राबवणे, स्वच्छतेचे संदेश देणे, सागर किनारे स्वच्छ करणे, स्वच्छता अभियान राबवणे ज्या वॉर्डमध्ये असे उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक संस्थेला शक्य आहे तिथे त्यांनी मदत करावी. प्रत्येक शासकीय विभागांनी आपल्या अखत्यारीतील  यंत्रणांना याची माहिती द्यावी. 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक दिवसाचा उपक्रम काय असेल याची माहिती सर्वांना कळविण्यात येईल.

      या अभियानात शासकीय/निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले, यांना सहभागी करून घेऊन अभियान सर्व समावेशक करणे,अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्याप्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये अमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहींमुळे स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडवून सार्वजनिक स्वच्छतेबाबत स्थायी बदल घडवणे हा अभियानाचा उद्देश आहे. वॉर्ड निहाय  होणाऱ्या उपक्रमांना बीएमसी तसेच शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,या सर्व कार्यवाहीसाठी संबंधित वॉर्ड ऑफिसर क्षेत्रस्तरावर समन्वय करतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

            विविध शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी या उपक्रमासाठी कशाप्रकारे योगदान देता येईल यासाठी आपली मते मांडली. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानामध्ये कार्यरत असणा-या स्थानिक सेवाभावी संस्था तसेच सहभागी अन्य समाजसेवी संस्थांनी अभियान कालावधीत श्रमदान, जनजागरण अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

    यावेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छ तेची शपथ घेतली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *