………………


सुश्री बहन मायावती जी यांचे देशभरातील पदाधिकाऱ्यांना आदेश
प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादीची बैठकीला उपस्थिती
दिनांक ३१ जानेवारी २०२५, पुणे:-
देशातील बहुजनांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आणखी बळ द्या.तळागाळातील शोषित, पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्ष संघटन बळकट करा, असे आदेश बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा,उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी दिले.राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पक्ष संघटनेच्या बैठकीत त्यांनी देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले, अशी माहिती पक्षाचे राज्य महासचिव,पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.३१) दिली. बैठकीत देशभरातील वरिष्ठ पदाधिकारी, प्रदेश अध्यक्ष आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
देशात वाढत असलेली आर्थिक विषमता,जातिवाद आणि सांप्रदायिकतेवर मा.बहनजींनी चिंता व्यक्त केली.भांडवलशाही धोरणांमुळे गरीब, बहुजन समाजाचे शोषण होतेय. सामाजिक,आर्थिक विषमता त्यामुळे वाढत असल्यावर बहनजींनी चिंता व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचे बीएसपीचे मुख्य उद्दिष्ट आहे.कॉंग्रेस,भाजप, समाजवादी आणि इतर पक्षांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानूसार बहुजनांना त्यांचा हक्क दिला असता तर, बहुजन समाज पक्ष स्थापन करण्याची गरजच पडली नसती, असे सुश्री बहनजी यांनी बैठकीतून स्पष्ट केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
बहुजनांना केवळ दिखाव्यासाठी जवळ करण्याची नीती या पक्षांची आहे. पंरतु,खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्याचे काम या पक्षांनी केल्याचे ठाम मत बहनजींनी व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.धनाढ्य, भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या या पक्षांमुळे गरीब, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित आहेत.बहुजन चळवळ कमकुवत करण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम या पक्षांकडून केला जावू शकतो. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवणे, नेत्यांबद्दल अपप्रचार या पक्षांकडून केला जावू शकतो. नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल आकास निर्माण करण्याचे तसेच बहुजन समाजाला गोंधळात टाकण्यासाठी षडयंत्र देखील हे पक्ष करण्याची शक्यता आहे. पंरतु, या सर्व साम-दाम-दंड-भेद नितीपासून वाचण्याचे आवाहन मायावती जी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.